Showing posts with label बालसंस्कार. Show all posts
Showing posts with label बालसंस्कार. Show all posts

Saturday, 20 June 2015

समर्थांचा महायोगी

समर्थांचा महायोगी


  श्री समर्थ म्हणतात 'देहालागी कष्ट केले। परी ते अवघे व्यर्थ गेले। देह देवाचे कारणीं। होता देव होती ऋणी।'      

महायोगी कोण हे वैराग्यपर अभंगावरून स्पष्ट करायचे आहे तेव्हा वैराग्य म्हणजे काय हे प्रथम पाहावे लागेल. इच्छा सोडून नि:स्पृहपणे जीवन जगणे म्हणजे वैराग्य. मी किंवा माझी ही वृत्तीच उठू न देणे म्हणजे वैराग्य. हे वैराग्नरदेहालाच विवेकाने प्राप्त होते. मानवाला मिळालेला नरदेह कशाकरिता मिळाला ह्याचे त्याला भानच नसते. प्रापंचिक माणूस विषयासुखात रमतो व निळालेल्या नरदेहाचे ध्येय काय हे विसरतो. ईश्वरप्राप्ती हे मानवाचे मुख्य ध्येय आहे. मिळालेल्या देहावर तो प्रेम करतो. श्री समर्थ म्हणतात 'देहालागी कष्ट केले। परी ते अवघे व्यर्थ गेले। देह देवाचे कारणीं। होता देव होती ऋणी।' प्राणी जे जे कष्ट करतो ते सर्व केवळ प्रपंचाकरिता आणि देह सजविण्याकरिता करतो. त्यामुळे त्याचे सर्व कष्ट वाया जातात. पुढे अंत:काळ येणारच, तो अंत:काळ येता येता तेथे नये चुकविता। अकस्मात जावे लागे। काही पुण्य आचरावे। नाही तर आयुष्याचा नाश ठरलेलाच म्हणून मानवाने विवेक करावा. विवेकी वर्तावे। मागे मूळ साभंळावे। ते मूळ सांभाळण्यास देवाची आठवण ठेवावी. याच्याशी सख्यत्व सांभाळावे. देवाच्या सख्यत्वासाठी। पडाव्या जिवलगाच्या तुटी। वेळ आली तरी प्राणही द्यावा. शेवटी, अशा त्यागमय जीवनालाच वैराग्य असे म्हणतात. वैराग्य खरे भाग्य होय. वैराग्यातच परमार्थाचे वर्म आहे. जो अनुभवसिद्ध आहे, आसक्तीरहित आहे, विवेकाने ज्याने वैराग्य अंगी बाणले आहे व सर्वस्वाचा त्याग केला आहे त्याला महायोगी म्हणावा. ' एक वैराग्य त्यागितां। अंगी बाणे लोलंकता। रामीरामदास म्हणे सर्व नीतींनें करणें। 396 व्या अंभगात श्री समर्थांनी सुंदर रूपक केले आहे. ते म्हणतात 'वेळ चालिला कोमल। त्यासी माया आलें फळ। आदिअंती एक बीज। जाले सहजी सहज।।

परब्रह्मरूपी कोमल वेल वर जात आहे. त्या वेलीला मायारुपी फळ लागले आहे. त्या फळामध्ये वेलीचे बीज आहे. त्या बीजापासूनच तर वेल रुजली आहे. ते बीज आदिअंती एकच नाही का? पण हा महायोगी मायारूपी फळाचे बीजच नरदेहाच्या साहाय्याने जाळून टाकतो. ह्या योग्यांना 'कान्ता, पुत्र, धन वैभव, स्वजन' काही आवडत नाही. केवळ रामाचे दासय्त्व तेवढे आवडते. त्याचाच त्यांना आनंद. तो आनंद ते स्वत: लुटतात व मुक्त हस्ताने लोकांना वाटतात. अशाप्रकारे ते मायेचा सर्वसंग परित्याग करतात. असे हे महायोगी. त्यांच्या ठिकाणी अज्ञानाचा लेशही नसतो. ते अद्वैतबोधात नांदत असतात व सर्व विश्व आत्मवत पाहातात. त्यांनी विकारांवर ‍जय मिळविलेला असतो. त्यांना प्रापंचिक उपाधी बाधतच नाही. 'प्रापंचिक नाही जयाते उपाधी।' असे निरुपाधिकपणे ते ह्या दृश्य जगताकडे पाहातत. तेच त्यांचे खरे भाग्य म्हणूनच ते खरे महायोग होत.

Monday, 1 June 2015

श्री मनाचे श्लोक – १ ते २०

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥
 
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥
मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।
मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।
न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥
सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
सुखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥
मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥
मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥
जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥
मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥१७॥
मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥
मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥
बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥
निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥

Total Pageviews